भारताची संसद

प्रस्तावना, लोकसभा

views

3:37
या पाठात आपण भारताच्या संसदेचा विचार करणार आहोत. भारतीय संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला ‘संसद’ असे म्हंटले जाते. किंवा संघशासनाच्या कायदेमंडळास ‘संसद’ असे म्हणतात. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती हे संसदेचे महत्त्वाचे घटक म्हणजेच अविभाज्य घटक असतात. परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून चर्चा किंवा विचारविनिमयात भाग घेता येत नाही. संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते.लोकसभा :- भारतीय संसदेचे म्हणजेच केंद्रीय कायदेमंडळाचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा होय. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणजेच, या सभागृहातील सदस्य प्रत्यक्ष व गुप्त मतदान पद्धतीने निवडून आलेले असतात. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण देशात विविध टप्प्यात होते. या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत पाच वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात.