दक्षिणेतील मोहीम

प्रस्तावना

views

5:21
प्रस्तावना :- मुलांनो, महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. शिवराय राजा झाले. राज्याभिषेकानंतर लगेचच त्यांनी स्वराज्याची घडी बसविण्यासाठी प्रयत्न केले. स्वराज्याची घडीही व्यवस्थित बसली, पण महाराजांना एक गोष्ट नेहमी सतावत होती. ती म्हणजे औरंगजेबला तोंड दयायचे म्हणजे आपल्या स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडे वाढविला पाहिजे. त्यासाठी दक्षिणेत आपले एखादे स्वत:चे मजबूत ठिकाण असले पाहिजे. झाले, महाराजांच्या मनात विचार आला, आणि महाराजांनी दक्षिणेवर स्वारी करण्याची मोहीम हाती घेतली. त्याचीच माहिती आज आपण या पाठातून घेणार आहोत. मोहिमेचा बेत :- ६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. पण या सोहळ्याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण राज्याभिषेकानंतर अवघ्या ११ दिवसांतच म्हणजेच १७ जून १६७४ रोजी मासाहेब मृत्यू पावल्या. स्वराज्याचे छत्रपती घडविणाऱ्या, स्वराज्याची संकल्पना प्रथम मांडणाऱ्या जिजामाता सगळयांना सोडून निघून गेल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. महाराजांचा आधारस्तंभ कोसळला. स्वराज्यातील सर्व जनतेचा प्रजेचा आधार शिवराय होते, तर शिवरायांचा आधार मासाहेब होत्या. महाराजांनी प्रत्येक निर्णय मासाहेबांना विचारूनच घेतला होता. प्रत्येक मोहीम त्यांच्या आशीर्वादानेच काढली होती. आता त्यांना आशीर्वाद देणारे हात राहिले नव्हते. आईच्या मृत्यूमुळे महाराजांना अतिशय दु:ख झाले. मासाहेबच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातील गुरू, मार्गदर्शक व आधारस्तंभ होत्या. आई आणि मुलाची ही जोडी म्हणजे जगात वेगळी होती.