सामाजिक व धार्मिक प्रबोधन

मुस्लीम समाजातील सुधारणा चळवळ

views

4:16
मुस्लीम समाजातील सुधारणा चळवळ : अब्दुल लतीफ यांनी मुस्लीम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात ‘द मोहम्मदन लिटररी सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी ‘मोहम्मदन अँग्लो- ओरिएंटल कॉलेज’ स्थापन केले. पुढे याचेच अलिगढ मुस्लीम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्त्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लीम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते. हिंदू समाजातील चळवळ : हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून १९१५ साली ‘हिंदुमहासभा’ या संघटनेची स्थापना झाली. विनायक दामोदर सावरकर हे त्याचे अध्यक्ष होते. १९१६ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात ‘बनारस हिंदू विद्यापीठाची’ स्थापना केली. डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी २७ सप्टेंबर १९२५ रोजी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ (आर एस एस) या संघटनेची नागपूर येथे स्थापना केली. आजही या संघटनेचे मुख्यालय नागपूर येथे आहे. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे हे या संघटनेचे मुख्य ध्येय होते. हिंदू सुधारणा चळवळीतील वि.दा सावरकरांचे कार्यही मोठे आहे. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकराना ब्रिटिशांनी रत्नागिरीत ठेवले. हिंदू समाज एकजीव व संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य केले. त्यांनी रत्नागिरीला असताना अनेक समाजसुधारणा केल्या. हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या ‘पतित पावन’ मंदिराची निर्मिती केली. जातिभेद मोडण्यासाठी त्यांनी सहभोजनाचे कार्यक्रम चालू केले. अशा प्रकारे आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा आहे.