भारताची संसद

विधेयकाचे कायदयात रूपांतर होण्याची प्रक्रिया

views

4:06
विधेयकाचे कायदयात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेतून जावे लागते:• पहिले वाचन :- विधेयक ज्या खात्याशी संबंधित आहे, त्या संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. म्हणजे त्या विधेयकात काय आहे? त्याचे महत्त्व, त्याची आवश्यकता का आहे? याबद्दल विचार मांडतो. यास विधेयकाचे ‘पहिले वाचन’ असे म्हणतात.• दुसरे वाचन :- दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. म्हणजे हे विधेयक कोणत्या उद्देशाने, हेतूने मांडले आहे, त्यामुळे कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत याबद्दल चर्चा होते. विधेयकाची उद्दिष्टे स्पष्ट झाल्यानंतर सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक म्हणजे विधेयक योग्य आहे, असे म्हणणारे विधेयकाच्या बाजूने मत मांडतात, विधेयक कसे योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. तसेच विधेयकातील उणीवा व दोष स्पष्ट करतात. अशा तऱ्हेने योग्य – अयोग्य अशा पद्धतीने सभागृहात चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. ही समिती त्या विधेयकावर अभ्यास करते त्या विधेयकात काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी सूचना व दुरूस्त्या सुचवणारा अहवाल सभागृहाकडे पाठवते. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात होते. या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. यावर सदस्यही दुरूस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते. अशा तऱ्हेने विधेयकाचे दुसरे वाचन पूर्ण होते. • तिसरे वाचन :- तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. त्यानंतर विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयकास आवश्यक असलेल्या बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत म्हणजे मंजूर केले असे मानले जाते. अशा तऱ्हेने संसदेच्या एका सभागृहाची मंजूरी मिळाल्यानंतर विधेयकाचा पुढचा प्रवास सुरु होतो. ते दुसऱ्या सभागृहात दाखल केले जाते. • संसदेच्या दुसऱ्या सभागृहात हे विधेयक आल्यानंतर त्यास पुन्हा या सभागृहातही वरील सर्व प्रकियांमधून जावे लागते. या सर्व प्रक्रियांमधून गेल्यानंतर या सभागृहाचीही संमती किंवा मंजुरी विधेयकास मिळाल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी त्यांच्याकडे पाठविले जाते.• केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबददल मतभेद, वाद झाल्यास दोन्ही सभागृहांचे संयुक्तपणे एकत्र अधिवेशन भरविले जाते. त्यात या विधेयकाचे भविष्य ठरते. म्हणजे हे विधेयक मंजूर होऊन त्याचे कायद्यात रूपांतर होणार की नाही ते ठरते. यानंतर दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाते. राष्ट्रपतींची सही झाल्यानंतरच या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होते. अशाप्रकारे एखादा कायदा तयार होण्यासाठी त्यावर वरील प्रकारे चर्चा, विचार, मते घेतली जाऊन मगच त्याचे कायद्यात रुपांतर होते.