लोकशाही

नोकरशाहीचे स्वरूप

views

3:03
नोकरशाहीच्या स्वरूपाचे काही प्रकार आपण पाहणार आहोत. 1) कायमस्वरूपी यंत्रणा :- मुलांनो, नोकरशाहीमुळे समाजात स्थिरता व सुसूत्रता येते. कर गोळा करणारी, पर्यावरणाचे रक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, आपल्याला सामाजिक सुरक्षितता देणारी ही नोकरशाही आपले काम अखंडपणे करत असते. याचे कारण ती कायमस्वरूपी असते, स्थिर असते. नोकरशाही सरकारसारखी दर पाच वर्षांनी बदलत नाही. दर निवडणुकांनंतर नवे प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकते, परंतु त्यांच्या नियंत्रणाखालील नोकरशाही बदलत नाही. कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी नोकरशाहीतील लोक आपली सेवाकाळ (रिटायरमेंट) संपेपर्यंत आपल्या पदावर कायम असतात. नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते.2) राजकीयदृष्ट्या तटस्थ :- नोकरशाही राजकीयदृष्टया तटस्थ असते. याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचे शासन सत्तेवर येवो, त्या शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे. माझ्या आवडीच्या पक्षाचे सरकार सत्तेवरून गेले म्हणून मी आता या सरकारची कामे करणार नाही. अशी नोकरशाहीने भूमिका घेत नसते. कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी पूर्ण निष्ठेने काम करावे लागते. सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतांनुसार काम करायचे नाही. एखादा पक्ष निवडणूक हरल्यामुळे सत्तेवरून दूर होतो व दुसऱ्या पक्षाचे सरकार सत्तेवर येते. अशा वेळी पहिल्या सरकारने काही धोरणे ठरविलेली असतील तर ती धोरणे नव्याने सत्तेवर आलेले सरकार बदलू शकते. अशा परिस्थितीत नोकरशाहीने ते बदलू नये, किंवा धोरण चांगले आहे. असे नव्या सरकारला न सांगता नोकरशाहीने तटस्थ राहून म्हणजे काहीही न बोलता, आपले विचार न मांडता आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.3) अनामिकता :- मुलांनो एखादया खात्याचे अपयश हे त्या खात्याच्या मंत्र्याचे अपयश असते. त्या खात्याच्या मंत्र्यास त्यासाठी जबाबदार धरले जाते. यालाच ‘अनामिकता’ असे म्हणतात. त्याची आपण व्याख्या पाहू. “अनामिकता म्हणजे एखादया धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप अनामिक ठेवणे होय.” आपल्या खात्याचा कारभार व्यवस्थित व पूर्ण कार्यक्षमतेने चालविणे ही त्या खात्याच्या मंत्र्याची जबाबदारी असते. त्यात चांगले काम झाले तरी मंत्र्याचाच उदोउदो केला जातो. किंवा एखादया खात्याच्या अकार्यक्षम कारभारालाही मंत्र्यानांच जबाबदार धरले जाते. सनदी सेवकांवर कोणत्याही प्रकारची जाहीर टीका होत नाही. खर तर धोरण ठरविण्याचे काम मंत्री करतात. व ते प्रत्यक्षात आणण्याचे काम सनदी अधिकारी करतात. सनदी अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम न केल्यामुळे एखादे धोरण अयशस्वी होते. परंतु ते काम मंत्र्यांनी सनदी अधिकाऱ्यांकडून करून घेणे गरजेचे असते. ते मंत्र्यांनी केले नसल्याने संसदही खात्याच्या गैरव्यवहारांसाठी व धोरणांच्या अपयशासाठी मंत्र्यांना जबाबदार धरते. या संदर्भातील सर्व जबाबदारी मंत्री स्वत: आपल्यावर घेतात. ते जनतेची माफी मागतात किंवा पदाचा राजीनामा देतात व नोकरशाहीला संरक्षण देतात. अशा प्रकारे भारतातील नोकरशाहीचे स्वरूप आहे.