सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

बंगालमधील क्रांतिकारी चळवळ

views

5:02
लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीमुळे सर्व देश व विशेष करून बंगाल प्रांत पेटून उठला होता. पूर्वी होणाऱ्या स्थानिक उठावांच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला. देशातील विविध भागांत क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरूण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. त्यांच्या माध्यमांतून ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसविणे, ब्रिटिश शासनयंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे होती. अशाच प्रकारची क्रांतिकारी संघटना बंगालमध्ये ‘अनुशीलन समिती’ या नावाने कार्यरत होती. अनुशीलन समितीच्या बंगालमध्ये पाचशेच्या वर शाखा होत्या. अरविंद घोष यांचे बंधू बारींद्रकुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. योगी अरविंद घोष, बारींद्रकुमार घोष आणि स्वामी विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त हे बंगालमधील प्रमुख क्रांतीकारी होते. अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन अनुशीलन समितीला लाभत असे. कोलकात्याजवळील माणिकताळा येथे या समितीचे बाँब तयार करण्याचे केंद्र होते. इंग्रज सरकारचे क्रांतिकारकांच्या हालचालींवर पूर्ण लक्ष होते. १९०८ साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी कलकत्त्याचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड याला जगातून नष्ट करण्याची योजना आखली, परंतु त्यांचा प्रयत्न फसला. ज्या गाडीवर त्यांनी बॉंब टाकला ती गाडी किंग्जफोर्डची नव्हती. या हल्ल्यात चुकून दोन इंग्लिश स्त्रिया मारल्या गेल्या. इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. तर खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी देण्यात आली. यावेळी खुदीराम बोस यांचे वय केवळ १५ वर्षे होते. खुदीरामच्या हौताम्याने सर्व हिंदुस्थान हळहळला. शाळा – कॉलेजातील विद्यार्थ्यांनी सुतक पाळले. या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना झाली. पोलिसांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड सुरू केली. कोलकात्यामधील क्रांतिकारकांच्या बाँब फॅक्टरीचा पोलिसांना सुगावा लागून त्यांनी तिच्यावर छापा घातला.