सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

चितगाव शस्त्रागारावरील हल्ला

views

3:08
सूर्य सेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्याभोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलत्ता वड्डेदार अशासारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली होती. त्यांच्या मदतीने त्यांनी अनेक धाडसी योजना आखून त्या यशस्वी केल्या होत्या. त्यांनी चितगाव येथील ब्रिटिश शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना आखली. योजनेप्रमाणे १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील दोन शस्त्रागारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. शस्त्रागार म्हणजे ज्याठिकाणी बंदूका, गोळ्या, पिस्तुले, काडतुसे, बॉम्ब ठेवले जातात असे ठिकाण होय. चितगाव शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतल्यानंतर क्रांतिकारकांनी लगेच टेलिफोन व टेलिग्राफ यांसारख्या संदेशवहनाच्या साधनांच्या तारा तोडून टाकल्या. म्हणजे ही बातमी इंग्रजी गोटाला मिळणार नाही. व ब्रिटिश सरकार तत्काळ जागे होणार नाही. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी जो लढा दिला तो खूपच रोमहर्षक होता. १६ फेब्रुवारी १९३३ रोजी म्हणजे साधारणपणे अडीच पावणेतीन वर्षांच्या कालावधीनंतर सूर्यसेन व त्यांचे सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सूर्य सेन व त्यांच्या बारा सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांच्या सहकारी कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. तर प्रीतिलता वड्डेदारने पोलिसांच्या हाती न लागता स्वत:च आपल्या प्राणाचा त्याग केला. चितगाव उठावामुळे लोकांच्या मनात प्रेरणा निर्माण झाली. यातून प्रेरणा घेत शांती घोष व सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले, तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात उपस्थित राहिलेल्या गव्हर्नरवर गोळया झाडल्या. १३ मार्च, १९४० रोजी पंजाबचा पूर्वीचा गव्हर्नर व जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असलेला गव्हर्नर ओडवायर याचा लंडनमध्ये खून करून क्रांतिवीर सरदार उधमसिंगाने जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला. ओडवायरच्या आदेशानुसारच हे हत्याकांड झाले होते. हिंदी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक प्रवाहांपैकी सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा एक महत्त्वाचा प्रवाह आहे. या चळवळीचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवले. त्यांचे राष्ट्रप्रेम व आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करण्याची वृत्ती संपूर्ण देशाने व जगाने पाहिली होती. त्यांचे बलिदान भारतीयांना स्फूर्ती देणारे ठरले आहे.