आदर्श राज्यकर्ता

सहिष्णू वर्तन

views

3:11
सहिष्णू वर्तन: महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला, त्यांच्यापैकी आदिलशाह, मुघल, सिद्दी या सत्ता इस्लामी म्हणजेच मुस्लीम होत्या. म्हणून काही महाराजांनी सर्व मुस्लिमांना आपले शत्रू मानले नाही. या सत्तांशी संघर्ष करताना महाराजांनी आपल्या स्वराज्यात असणाऱ्या मुस्लीम प्रजेला नेहमी आपले मानले. त्यांनी कोणत्याही धर्मांतील लोकांमध्ये भेदभाव केला नाही. ते सर्व धर्मांना समान मानत आणि सर्व धर्मांचा आदर करत. महाराजांनी स्वराज्य स्थापण्यासाठी सर्व जाती- धर्माच्या एकनिष्ठ असणाऱ्या शूर, त्यागी मावळ्यांची साथ घेतली. त्यांचे आरमार प्रमुख दौलत खान, इमानी सेवक मदारी मेहतर, हे सर्व मुस्लीम होते. आणि हे महाराजांच्या विश्वासातील होते. या सर्वांना महाराज आपला माणूस मानत होते. या सर्वांनीही महाराजांना स्वराज्य स्थापनेत प्रामाणिकपणे साथ दिली. अफजलखानच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. म्हणजेच ते आपल्या धर्माप्रमाणे इतर धर्मांचाही आदर करीत असत. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता, तेथील मुस्लीम धर्मस्थळांना आधीपासून मिळत असलेल्या सोई-सवलती ते तशाच चालू ठेवत. मुस्लीम इतिहासकार खाफीखान याने आपल्या ग्रंथात म्हटले आहे की, शिवाजी महाराजांनी असा नियम केला होता की, लष्करी मोहिमांच्या वेळी सैनिकांनी मशिदीस अथवा कुराणास त्रास देऊ नये. एखादी कुराणाची प्रत हाती पडल्यास ती मोठ्या पूज्य भावनेने मुस्लिम व्यक्तीच्या स्वाधीन करावी. महाराजांच्या राज्यांत हिंदू व मुस्लिम यांना समान वागणूक मिळत असे. धर्मवेडाने राज्य मोठे होत नाही. सर्व धर्मासंबंधी समान भाव असल्याने राज्य मोठे होते. ही राजांची ठाम धारणा होती.