मुघलांशी संघर्ष

सुरतेवरील स्वारी

views

3:01
सुरतेवरील स्वारी :- शायिस्तेखानाने 1660 ते 1663 या तीन वर्षात स्वराज्याची प्रचंड लूट केली होती. आणि त्याची भरपाई करणे गरजेचे होते. तसेच महाराजांना मुघलांना धडा शिकवायचा होता.सुरत हे मुघलांच्या ताब्यातील दिल्लीच्या खालोखाल श्रीमंत असे व्यापारी केंद्र आणि बंदर होते. अशा सुरतमध्ये इंग्रज, डच व फ्रेंच यांसारख्या परदेशी व्यापाऱ्यांच्याही वखारी होत्या. सुरतमधून बादशाहाला सर्वात जास्त महसूल, उत्पन्न मिळत असे. तसेच प्रचंड संपत्ती सुरतमध्ये होती. म्हणून महाराजांनी सुरतेवर स्वारी केली.राजगडापासून अंदाजे 325 km उत्तरेला असलेल्या सुरतला औरंगजेबाचे 5000 सैन्य पहारा देत होते. तरीही बहिर्जी नाईक या महाराजांच्या गुप्तहेरामुळे महाराजांना सुरतेतील खडा न खडा माहिती मिळाली होती. सुरतेवर निघण्याची तयारी झाली. 8 हजार घोडेस्वार तयार झाले. 15 डिसेंबर 1663 ला आई जगदंबेचे आणि जिजामातेचे आशीर्वाद घेऊन महाराज निघाले. 5 जानेवारी 1664 मंगळवारी महाराज सुरत जवळील घणदेवी येथे पोहोचले. पुढे ते उधन्यास येऊन पोहोचले. तेथून महाराजांनी सुरतेचा सुभेदार इनायतखान याच्याकडे आपल्या वकिलामार्फत संदेश दिला की, सुभेदाराने व सुरतेतील श्रीमंत व्यापा-यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी म्हणजेच पैसे, हिरे, सोने हे द्यावे. अन्यथा आम्ही सुरतेवर हल्ला करू. परंतु इनायतखानने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे महाराजांनी सुरत लुटण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी सावकारांचे वाडे ताब्यात घेऊन सोने, रूपे, मोती, हिरे, होन यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तूंची सलग चार दिवस लूट केली. आणि हे करीत असताना सुरतेचा सुभेदार त्यांना थांबवू किंवा विरोध करू शकला नाही. हे सर्व करीत असताना महाराजांनी तेथील सामान्य, गरीब लोकांना जराही त्रास दिला नाही. अशा तऱ्हेने महाराजांनी सुरतेमधून मोठया प्रमाणात संपत्ती मिळविली. सुरतेवरील मोहीम यशस्वी केली.