समतेचा लढा

समाजवादी चळवळ

views

3:00
सामान्य लोकांच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे, त्यांना देशातून हाकलून लावणे गरजेचे आहे, असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. तसेच भारतीय समाजरचना ही गरिबांवर अन्याय करणारी आहे, या समाजाची आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्त्वावर फेररचना झाली पाहिजे, याची जाणीव त्यांना होऊ लागली. या जाणिवेतूनच समजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला. राष्ट्रीय सभेत समाजवादी विचारसरणीचा तरुण वर्ग होता. त्यातील काही तरुणांनी नाशिकमध्ये तुरुंगात असताना राष्ट्रीय सभेअंतर्गत ‘समाजवादी पक्ष’ स्थापण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार १९३४ साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मिनू मसानी, डॉ. राममनोहर लोहिया इत्यादी नेते होते. १९४२ च्या ‘छोडो भारत’ या आंदोलनात समाजवादी विचारसरणीचे तरुण पुढे होते. समाजवादी विचारसरणीच्या तरुणांमुळे भारतीयांना साम्यवाद व साम्यवादी विचारसरणी मांडणारे कार्ल मार्क्स यांचा परिचय होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी १८८१ मध्येच कार्ल मार्क्सविषयी लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर जगाप्रमाणेच भारतातही साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. भारतीयांनाही साम्यवादी विचारसरणी पटू लागली. मानवेंद्रनाथ रॉय या भारतीय तरुणाचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता. १९२५ मध्ये भारतात स्वतंत्र साम्यवादी पक्षाची स्थापना झाली.