शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

संतकार्याची फलश्रुती

views

04:26
संतकार्याची फलश्रुती :- महाराष्ट्रातील संतांनी लोकांना चांगले संदेश दिले. त्यांनी लोकांना माणुसकी व मानवताधर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे, एकजुटीने राहावे ही शिकवण दिली. त्यांनी केलेल्या उपदेशामुळे लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली. दुष्काळ, परकीय आक्रमण किंवा इतर कोणतीही नैसर्गिक संकटे आली तरीही त्यांची परवा न करता कसे जगावे, याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार बनला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती, म्हणजेच धर्माला उतरती कळा लागली होती. धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर होता. अशा वेळी लोकांचे मनोबल वाढविणे गरजेचे होते. ते कार्य संतांनी केले. संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगू लागले. लोकांच्यातच राहून त्यांची सुखदुःखे समजून घेऊन भक्तिमार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे ते मानत. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, ‘तुका म्हणे तोची संत | सोशी जगाचे आघात |’या ओवीचा अर्थ असा आहे की, खरा संत तोच आहे जो जगाने दिलेले दु:ख सहन करीत असतो. तुकारामांच्या मते, खऱ्या संताचे लक्षण हेच असते. संतांनी शास्त्री व पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माच्या शिकवणीला सोप्या आणि सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत आणले. त्यांनी देवाची प्रार्थना दैनंदिन वापरातील भाषेत केली. परमेश्वरापुढे सर्वजण समान आहेत, कोणी उच्च किंवा कोणी नीच नाही. वर्ण वा जात यांचा गर्व, अहंकार बाजूला सारून आपण त्या एकाच परमेश्वराची लेकरे आहोत असे स्वत:ला पाहिले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली.