ब्रिटिश सत्तेचे परिणाम

मुलकी नोकरशाही

views

04:48
मुलकी नोकरशाही :- भारतातील इंग्रजी सत्ता मजबूत करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. म्हणजे राज्यकारभार चालविण्यासाठी पात्र, हुशार अशा नोकर वर्गाची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालीस या अत्यंत कार्यक्षम अशा गव्हर्नर जनरलने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कॉर्नवालिसची कारकीर्द कंपनीच्या काळात त्याने केलेल्या सुधारणांनी गाजली. त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये, असा नियम घालून दिला. जो काही व्यापार करायचा तो ईस्ट इंडिया कंपनीसाठी करावा असा नियम घातला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढविले. अशा तऱ्हेने त्याने कंपनीतील भ्रष्टाचाराला आळा घातला. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हयाचा प्रमुख असे. त्याच्या देखरेखीखाली जिल्ह्याचा कारभार केला जात असे. जिल्हाधिकारयांनी महसूल गोळा करणे, न्याय देणे, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे ही कामे पार पाडावी लागत. लॉर्ड कॉर्नवालिसने हुशार, पात्र व पदास योग्य अधिकारी प्राप्त व्हावे म्हणून अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (आय.सी.एस.) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे करण्यास सुरुवात केली. लष्कर व पोलीस दल :- भारतातील इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांचे संरक्षण करणे, तसेच भारतातील इतर नवे प्रदेश काबीज करणे, भारतातील लोकांनी इंग्रजांना विरोध केला किंवा उठाव केला तर ते उठाव दडपणे किंवा मोडून काढणे ही कामे इंग्रजी लष्कर करीत असे. तर देशात कायदा, सुव्यवस्था व शांतता राखणे हे पोलीस दलाचे काम असे.