मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम

महाराणी ताराबाई

views

4:48
महाराणी ताराबाई : महाराणी ताराबाई यांचा जन्म १६७५ मध्ये झाला. ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. ताराबाईंचे कर्तृत्व एवढे उच्च होते की, त्यांचे कौतुक करण्याचा मोह मुघल इतिहासकार खाफीखान यालाही आवरता आला नाही. खाफीखान महाराणीचे वर्णन करताना म्हणतो की, “ताराबाई अतिशय बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार याबाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिच्या नावाचा लौकिक झाला होता.” इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या तडफदार सुनेने सतत औरंगजेबाला हुलकावणी दिली. ताराबाईंनी सगळा कारभार आपल्या हातात घेतला. सरदारांना स्वराज्याच्या कार्याला जोडून घेतले. मराठा सैन्यातील शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या मदतीने तिने औरंगजेबाशी जोरदार लढा दिला. ताराबाईंच्या कार्याचे वर्णन करताना ‘शिवभारत’ ग्रंथाचे रचनाकार परमानंदाचा मुलगा कवी देवदत्त म्हणतो: ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली | दिल्ली झाली दीनवाणी |दिल्लीशाचे गेले पाणी | रामराणी भद्रकाली | रणरंगी क्रुद्ध झाली | प्रयत्नाची वेळ आली |मुगल हो सांभाळा || रामराजाची बायको ताराबाई ही भद्रकाली देवीसारखी रागविली आहे. आणि तिच्या रागापुढे दिल्लीचा बादशहासुद्धा काही करू शकत नाही. तिच्या भीतीने बादशाहाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता मुघलांनो तुम्ही स्वतःला सांभाळा, तिच्या प्रकोपातून किंवा रागातून तुमची सुटका होणार नाही.