आर्थिक विकास

पहिली पंचवार्षिक योजना (१९५१-१९५६)

views

4:58
पहिली पंचवार्षिक योजना :- (१९५१-१९५६) :- या पंचवार्षिक योजनेत सर्वात जास्त महत्त्व कृषी विकासाला दिले होते. या योजनेवेळी दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठया प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. म्हणून कृषी विकासावर भर देण्यात आला. तसेच सामाजिक विकास, जलसिंचन व पूरनियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यांवर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. दुसरी पंचवार्षिक योजना (१९५६ - १९६१) :- या योजनेत जड व मूलभूत उद्योगांना प्राधान्य देण्यात आले. या योजनेचा प्रस्तावित खर्च ४८०० कोटी रू होता. प्रत्यक्षात मात्र ४६०० कोटी खर्च झाला. या योजनेत औद्योगिकीकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुर्गापूर, भिलाई, येथील पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने उभारण्यात आले. तिसरी पंचवार्षिक योजना (१९६१-१९६६):- या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. दरवर्षी राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग, विकास, विषमता नष्ट करणे आणि रोजगाराच्या संधीचा विस्तार करणे हा या योजनेचा मुख्य हेतू होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान तीन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्या म्हणजे १९६२ चे चीन युद्ध, १९६५ चे पाकिस्तान युद्ध आणि १९६५ -६६ चा भीषण दुष्काळ. यामुळे विकासाच्या कामांपेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले.